महात्मा गांधीजी
भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्माजींची जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.
१८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले.
तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोग त्यांनी तेथेच केला.
तेथेच त्यांनी १९०३ मध्ये इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. १९१४ मध्ये ते भारतात परतले.
१९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले.
१९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकऱयांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथे मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, १९४०-४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सा्यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले.
९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे सहा मे १९४४ ला त्यांना सोडणअयात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले.
त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोआखालीत सुरू असेलली जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणाऱ्या महात्मा गांधींना एका असंतुष्टाने तीस जानेवारी १९४८ मध्ये गोळी घातली.
त्यातच त्यांचे निधन झाले.
महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थतज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता.
ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे.
इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे...
व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले.त्यांनी सुरू केलेल्या 'हरीजन' वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे होता. सामाजिक सुधारणा, शिक्षण पर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, रणनीती यांचेही विवरण असायचे.
प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते, असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता. यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल.
No comments